अतिपुरानंतर तीन महिने उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
जेजुरी (वार्ताहर) – सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीला महापूर आला होता. यामध्ये नदी पात्रावरील अनेक पूल वाहून गेले. या घटनेस तीन महिने उलटूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी 24 व 25 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कऱ्हा नदीला महापूर आला होता. पुरंदरच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा महापूर आल्याने नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. या महापूरात घरे, रस्ते उध्वस्थ झाले होते. या महापूरास आज नव्वद दिवस होऊन गेले. पूर्व पुरंदरच्या नाझरे, पांडेश्वर, रोमनवाडी, मावडी पिंपरी आदी या परिसरातील गावांना जोडणारा मुख्य जेजुरी-नाझरे रस्त्यावरील पूल वाहून गेला होता. यामुळे या गावांना जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पूलाची तात्पुरती दुरुस्तीही केली होती. या पुलावरून रोज शाळकरी मुले, शेतकरी, कामगार वर्गाची ये-जा होत असते. मात्र हा पूल तुटल्याने सध्या प्रवाशांना जुना तुटलेला पूल वापरावा लागत आहे.
प्रवाशांना होतोय नेहमीच मनस्ताप-
येथील जुन्या पूलाची दुरवस्था झालेली असल्याने पूलावरून जाताना अनेक वाहने या पुलावर अडकत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नेहमीच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. नदी पात्रावरील वाहून गेलेल्या अनेक पूलांच्या रखडलेल्या दुरुस्त्या त्वरित करण्यात याव्यात, अशी मागणी नदी काठचे रहिवाशी करू लागले आहेत.