कोल्हापूर – राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरं आहे. सरकारची ऐट राजाची आणि अवस्था भिकाऱ्याची आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेठवडगावात राज्यव्यापी किसान परिषद घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खोत म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.अतिवृष्टीग्रस्तांसाठी लगोलग कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. पण आत्ता त्यांनीच 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या जीआरची 20 तारखेला होळी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. लवकरच मी सरकार विरोधात किसान परिषद घेणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.