पुणे – क्षेत्र कोणतेही असो, कल्पनाशक्तीदवारेच सकारात्मक बदल होऊ शकतो आणि त्यातूनच विकास साधला जाऊ शकतो, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले. तर, कल्पकतेला वाव देण्यासाठी राज्यसरकारकडून ठोस धोरण राबविले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यूथएड फाउंडेशनतर्फे आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येस प्रदर्शनाच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पेटीएमचे उपाध्यक्ष युवा अभिनव कुमार, 5 एफ वर्ल्ड, पीसीसी अँड एसव्हीपी इंडियाचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, आदित्य बिर्ला गुप्सचे अध्यक्ष देव भट्टाचार्य, जीटीटीच्या अध्यक्ष उमा नटराजन, पुणे सिटी कनेक्टच्या रुचि माथुर, स्टुडिओ कॉम्प्रेचे सहसंस्थापक रश्मी रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी देशाच्या विविध भागातून आलेल्या 85 तरुण-तरुणींच्या कल्पनांपैकी विविध श्रेणीतील 5 व सल्लागारासाठी 25 कल्पनांची निवड करण्यात आली. त्यात दीपिका पाटील (पुणे), प्रेम कुमार (उस्मानाबाद), नीलम अंब्रे (पुणे) रायपूर येथील कौशल कुमार, मुरली कृष्णा (हैदराबाद) यांनी अनुक्रर्म पर्यटन आणि आतिथ्य, कृषी-आधारित व्यवसाय, मायक्रो-बिझिनेस, सामाजिक प्रभाव कल्पना, तंत्रज्ञान आणि नाविन्य या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना बक्षिसे जिंकली. इंदापूर येथील कल्पना धोत्रे यांना सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून गौरविण्यात आले. यावेळी 200 उद्योजकांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन पीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, अदमास युनिव्हर्सिटीचे प्रा. उज्ज्वल चौधरी, डीएसटीच्या अध्यक्ष मिनी बेदी, इनोव्हेशन सोसायटीच्या व्यवस्थापक सिझो वर्गीस यांच्या हस्ते करण्यात आले.