सातारा -मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहूसाठी 25 हजार व बागायती क्षेत्रासाठी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री आहेत. ठाकरे वचनाला जागणारे सरकार आहे. त्यांनी वचन पूर्ण करावे, अशी कोपरखळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मारली.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते साताऱ्यात आले होते. त्यांनी जावणी तालुक्यातील मेढा व सातारा तालुक्यातील परळी भागात पाहणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, डॉ. सचिन साळुंखे, नगरसेवक सुनील काळेकर, सौ. सुवर्णा पाटील, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून दरेकर यांनी जिल्ह्यातील माहिती घेतली. दरेकर म्हणाले, सातारा जिल्ह्यात उद्यापर्यंत सर्व पंचनामे होतील. एका गावात ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक एकत्र पंचनामे करत होते. त्यांची संख्या कमी असल्याने त्यांना विभागून काम देण्यात आले आहे. महसूल विभागाने चांगली यंत्रणा राबविली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याचे काय झाले? फडणवीस सरकार असताना विशेष जीआर काढून हेक्टरी 18 हजार आणि शेळी, जनावरांचे नुकसान व घरांच्या पडझडीबाबत भरपाई दिली होती. आता दीर्घकालीन उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
केंद्र शासन राज्य सरकारच्या पाठीशी आहे. दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली होती. राज्य सरकारने प्रस्ताव दिला की, मदत मिळणार आहे. केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. दोन दिवसांत नुकसान भरपाईबाबत निर्णय न झाल्यास भाजप संघर्षाची भूमिका घेईल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
शेतकऱ्यांची मुले शिक्षणासाठी शहरांमध्ये पेईंग गेस्ट म्हणून किंवा भाड्याने राहत होती. त्यांच्याकडे सात महिन्यांच्या भाड्याचा तगादा लावला जात आहे. कागदपत्रे दिली जात नाहीत, असे विचारले असता, दरेकर म्हणाले, याचा तपशील दिल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावू.