पुणे : “विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाला राज्य सरकार कारणीभूत आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आकारलेले परीक्षा शुल्क ते शैक्षणिक शुल्क भरण्यापर्यंतचे अनेक प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी मंगळवारी केली.
सरकारला विद्यार्थ्यांच्या करिअरची काळजी नाही, हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे व्यक्तव्यांवरून अनेकदा दिसून आले आहे, अशी टीकाही बेगडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दि.27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन जनजागृती करणार आहे. यात सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना मागणीचे पत्र देण्यात येणार आहे व त्यांच्याकडून समर्थन पत्र घेण्यात येणार आहे. सर्व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
विविध मागण्यांचे पोस्टकार्ड मंत्री उदय सामंत यांना पाठवणार आहे, असे बेगडे यांनी सांगितले. यावेळी महानगर अध्यक्ष प्रा.शरद गोस्वामी, शुभम भुतकर, ऋतुजा जाधव उपस्थित होते.