मुंबई – राज्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्व प्रकारे नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असे साकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला घातले आहे.
राजेश टोपे म्हणाले कि, राज्य सरकार सर्व प्रकारे नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे.
तसेच, ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात सध्या 6 लाख 85 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे 10 ते 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या 1250 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे 300 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. केंद्र शासनदेखील सुमारे 50 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्या माध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे.