मुंबई – मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
राज्य सरकारने कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्यात काही ठिकाणी धरपकड केली आहे. राज्याचे पोलिस प्रशासन आपल्या जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या व्हिडीओचा दाखला देत आज नव्याने राजकारण तापविण्याचे काम केले. मात्र बाळासाहेबांच्या त्या भाषणानंतर 1995 सालामध्ये शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त राज ठाकरे क्रियाशील होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी दुसरं काही करण्यापेक्षा त्यात लक्ष घातलं असत तर बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द पाळता आला असता, असा टोला भुजबळ यांनी राज ठाकरेंना लगावला. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.