मुंबई – कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा राज्य सरकारने कधीही लपविलेला नाही. महाविकास आघाडी सरकार पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली काम करत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन पद्धतीची रुग्णालये आहेत. एक सरकारी आणि दुसरे खासगी. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आकडेवारी अपडेट करण्याचे काम जिल्हा शल्यचिकित्सक हे पटकन करत असतात. मात्र खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील कर्तव्यदक्षतेच्या भावनेतून हे काम लगेच करणे गरजेचे असते. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयातील आकडेवारीचे अपडेशन करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर दिलेली आहे. आकडेवारी जमविण्यात फार फार तर आठवड्याभराचा उशीर ग्राह्य धरलेला आहे. मात्र त्यापेक्षा उशीर झालेला चालणार नाही, असे आदेश आरोग्य विभागामार्फत देण्यात आले असल्याचे, आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आकडेवारी अपडेट करण्याचे काम डेटा एंट्री ऑपरेटर करत असतात. खासगी रुग्णालयात कधी कधी माहिती अपडेट करण्यात थोडा उशीर होतोय. पण त्यात कोणतीही लपवाछपवी नाही, असे ठाम उत्तर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
लोकसंख्या आणि रुग्णसंख्येप्रमाणे लशी पुरवा
केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास सांगितले आहे. या निर्णयाचे राज्य म्हणून आम्ही स्वागतच करत आहोत. मात्र याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असून महाराष्ट्राला लोकसंख्या आणि रुग्णसंख्येच्या प्रमाणात अधिक लशींचा पुरवठा करावा, अशी मागणी केली असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. यावर दोन दिवसात नियमावली जाहीर करु असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही टोपे यांनी दिली.