मुंबई – इंग्लंडचा संघ पुढील वर्षी भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या मालिकेतील सामने अहमदाबाद, चेन्नई व पुणे या तीन ठिकाणीच आयोजित केले जाणार असल्याने मुंबई व बंगाल क्रिकेट संघटनेने बीसीसीआयच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेतील सामन्यांचे आयोजन न मिळाल्याने या संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर मायदेशी परतल्यावर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-20 तसेच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत बायोबबल सुरक्षा तयार करण्यात येणार आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने या मालिकेतील सामने केवळ या तीनच शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. पुण्यात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने होणार असून टी-20 सामन्यांची मालिका अहमदाबादमध्येच होणार आहे.
दोन कसोटी सामनेही अदमदाबादमध्ये होणार असून दोन कसोटी सामने चेन्नईला होणार आहेत. पण बीसीसीआयच्या या निर्णयावर मुंबई व बंगाल संघटनेला एकाही सामन्याचे आयोजन देण्यात आले नसल्याने या संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे स्वतः कोलकाताचे असूनही त्यांनी बंगाल संघटनेला कसे काय डावलले असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
मुंबईत गेल्या चार वर्षांमध्ये एकही कसोटी सामना खेळवण्यात आला नाही. तसेच कोलकातालाही गेल्या काही वर्षांत सामने मिळण्याच्या संख्येत घट झाली आहे. करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे गेल्या मार्चमध्ये होणारा भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोलकातामधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील काही सामने कोलकाता येथे होतील, अशी अपेक्षा, बंगाल क्रिकेट संघटनेला होती. मात्र, कोलकात्याला या मालिकेतील एकही सामना न मिळाल्यामुळे संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.