सातारा – जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त झालेला पाऊस पडला आणि स्वच्छतेच्या उपाययोजनांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे साताऱ्यात डेंगीसदृश साथीने डोके वर काढले आहे. साचलेली घाण वाहत्या पाण्याबरोबर निघून जाते; पण शहरातील ओढे-नाले मुसळधार पावसाने पुन्हा तुंबल्याने डास आणि माशांचे प्रमाण वाढले आहे. या डासांमुळे शहरात साथरोगांची लागण झपाट्याने पसरत आहे. याबाबत पालिकेचा आरोग्य विभाग उपाययोजना करत असला तरी धूर फवारणीव्यतिरिक्त ठोस नियोजन नसल्याने हे उपाय अपयशी ठरत आहेत.
शहरात गेल्या आठवड्यापासून डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून सध्या 27 जण डायरियाने त्रस्त आहेत. डासांमुळे गेल्या महिन्यात डेंगीचे पाच पॉझिटिव्ह तर दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. शनिवार पेठ, सोमवार पेठ, बसाप्पा पेठ, भवानी पेठ, रामाचा गोट, नामदेववाडी झोपडपट्टी या भागातील नागरिकांमध्ये अचानक ताप येणे, सांधेदुखी, डोळ्याच्या आतील भागात वेदना, अशा तक्रारी वाढत असून शहरात डेंगीसदृश्य साथीने डोके वर काढले आहे.
जागोजागी पडलेला कचरा पावसात भिजल्याने कुजून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या माशा कुजलेल्या कचऱ्यावर बसतात आणि साथरोगाचा प्रसार करतात. पावसाळा सुरू होताच पालिकेच्या आरोग्य विभागाने साथरोग प्रतिबंधासाठी बेटिंग, औषध फवारणी, धूर फवारणी मोहीम हाती घेतली तरी त्यात सातत्य नव्हते; परंतु आरोग्य विभाग जनजागृती केल्याचा आव आणून कागदी घोडे नाचवत आहे. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आठच दिवसांपूर्वी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली होती.
जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठली. सकाळी पाऊस आणि रात्री थंडी, मध्येच वाढता उष्मा, अशा विचित्र वातावरणाने तापाच्या रुग्णांची संख्या वाढली. शहरात डेंगीचे पाच रुग्ण आढळले आहेत तर दोन संशयित रुग्ण आहेत. खासगी रुग्णालयांचा आढावा घेतल्यास ही संख्या वाढू शकते. मात्र, रुग्णांच्या नेमक्या संख्येची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. डायरियाच्या रुग्णांतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापासून सर्दी, खोकल्याचीही साथ सुरू आहे. आजघडीला शहरात सर्दी, खोकल्याचे 64 रुग्ण आढळले आहेत.
ही केवळ पालिकेच्या आरोग्य विभागाने सादर केलेली आकडेवारी असून प्रत्यक्षात रुग्णसंख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. डास व माशांची उत्पत्ती कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने आणखी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक वॉर्डात औषध फवारणी, बेटिंग, फॉगिंग आवश्यक आहे. मात्र, केवळ डेंगीचा रुग्ण आढळला तरच पालिकेचा आरोग्य विभाग फवारणी सुरू करतो. स्वच्छताही नियमित होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.