पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाहेरून 1 लाख 48 हजार नागरिक आल्याने बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण परिसरात असलेल्या 203 करोना बाधितांपैकी 168 जण हे बाहेरून आलेले आहेत. ग्रामीण भागात अधिकाधिक लक्ष दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
करोनाबाबतची माहिती देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद सहभागी झाले होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबईतून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना होम क्वारंटाइन करणे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे ही कामे करण्यात येत आहेत. प्रशासनाचे अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी हे बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, काही नागरिक हे कर्मचाऱ्यांच्या आढळले नाहीत, तर नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिली पाहिजे, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
संपूर्ण जिल्ह्यात 103 मोबाइल व्हॅन तपासणीसाठी कार्यरत आहेत. 32 कोविड केअर सेंटर सुरू झाली आहे. यातील काही ठिकाणी तपासणीसाठी स्रावदेखील घेतला जात आहे. ग्रामीण भागात सुमारे सहा हजार कर्मचारी हे सर्वेक्षण करत आहेत. त्यांच्याकडे मतदार यादी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांची माहिती मिळत आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे