रानफुले, फुलपाखरांचे जिल्हास्तरीय चौथे सर्वेक्षण
नगर – पावसाळा संपून हिवाळा सुरू होतांना निसर्ग हिरवा शालू नेसतो, त्यावर कशिदाकारी केल्या प्रमाणे निसर्ग आपले रंगही भरतो. अशाच निसर्गाने रंग भरलेल्या कलाकुसरीतून निर्माण होतात नवनवीन जातीची रानफुले अन पाखरंही…
आपल्या जिल्ह्यातील जैवविविधतेचा शोध व त्याचे संगोपन व संवर्धनाच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी, जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र तथा पर्यावरण मित्र संघटना भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पावसाळी रानफुलांचे व फुलपाखरांचे सर्वेक्षण संपुर्ण जिल्हाभर फिरून त्यांच्या नोंदींचे संकलन दरवर्षी केले जाते.
या संस्थेचे अध्यक्ष तथा निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षी हे जिल्हास्तरीय सर्वेक्षण ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या काळात पुर्ण करण्यात आले.
या संस्थेतील अभ्यासक सचिन चव्हाण, प्रतीम ढगे, संदिप राठोड, अनमोल होन, डॉ. अशोक कराळे, अजिंक्य सुपेकर यांसह रूषीकेश परदेशी, पार्थ देवांग, नम्रता सातपुते, दीपा मव्हारे, श्लोक लोटके, संजय बोकंद, दिनेश कलोसिया, मंगलाराम, अनिता ससाणे, मुकुंद दहिफळे, ऋषीकेश लांडे, सुधीर दरेकर, संदिप साकुरे, शिवकुमार वाघुंबरे, संतोष शिरसागर, देवेंद्र अंबेटकर, परमेश्वर भवर आदी प्रौढनिरीक्षकांसह सुमारे विद्यार्थी जिल्हाभरातून या उपक्रमात सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील गर्भगीरी डोंगर रांगा, लहान मोठे तलाव व धरणांचा परिसर आदी निसर्गवैभवसंपन्न भागात हे सर्वेक्षण प्रामुख्याने केले जाते. जिल्ह्यातील जैवविविधता वृद्धींगत करण्याच्या हेतूने निसर्गोपयोगी वनस्पतींच्या बीयांचे जाणीवपुर्वक संकलन व रोपणही यावेळी सदस्यांमार्फत केले जाते.
या सर्वेक्षणानुसार जिल्हाभरात यावर्षी वैशिष्ट्यपुर्ण पावसाळी रानफुलांची नोंद झाली असुन यात भारंगी, दुधाली, वायाटी, सोनकी, सोमवल्ली, रानजीरे, रत्नमाला, गणेशफुल, केनी, निलवंती, घाणेरी,पंद,तिळवण,कल्प,दहाण,तेरडा, नीसुरडी, घोडेगुई, झरवड, चिमनाटी, तुंबा,सोळन आदी रानफुले मुख्यत्वे लक्षवेधी ठरत आहेत.