नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर याठिकाणी नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने असे काही केले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
कर्नाटकातील या वादावर बोम्मई यांनी प्रतिक्रिया देताना,”काँग्रेस बदल्याच्या भावनेतून राजकारण करत आहे. त्यांनी जेव्हा आरएसएसवर बंदीची घोषणा केली लोकांनी त्यांना घरी पाठवले आहे. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी बंदी घालून दाखवावी.
कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे माजी मंत्री आर. अशोक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “तुमचे वडील आरएसएसवर बंदी घालू शकले नाहीत, दादींनी देखील हे केले नाही. तुमचे आजोबा सुद्धा करू शकले नाहीत. तर आता तुम्ही काय करू शकणार?”, असा प्रश्न अशोक यांनी केला आहे.
एकेकाळी काँग्रेसचे संसदेत बहुमत होते आणि देशातील १५-२० राज्यांमध्ये सरकारे होती. मात्र अशा वक्तव्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. हिंमत असेल तर आरएसएसवर बंदी घाला, तुमचे सरकार तीन महिनेही टिकणार नाही, असे अशोक यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा पक्ष कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्यास तयार आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, मग ती आरएसएस असो वा बजरंग दल किंवा अन्य कोणतीही जातीयवादी संघटना असो.