बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल : सोमवारी होणार सुनावणी
मंचर – बैलगाडा शर्यतबंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी सोमवारी (दि. 15) होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. त्यामुळे आता लवकरच भिर्रर्र….’चा आवाज राज्यातील पंचक्रोशीत घुमण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार आढळराव म्हणाले की, राज्यात बैलगाडा शर्यती अखंडितपणे सुरू राहाव्यात यासाठ गेली अनेक वर्षे न्यायालयीन पातळीवर तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन 2013-14 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली होती.
संसदेत बैलगाडा शर्यतींचा कायदा व्हावा यासाठी जोरदार आवाज उठविल्यानंतर 2016 मध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ज्या शासन निर्णयाच्या आधारे 2011 मध्ये शर्यतींवर बंदी आली होती. यामध्ये दुरुस्ती करूनही अटींवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती;
मात्र या केस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने बैलगाडा शर्यती सुरू होऊ शकल्या नव्हत्या. या प्रकरणातील कायदेशीर पेच दूर व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंच खंडपीठाने निर्णय घ्यावा. यासाठी आपण 2017 पासून पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.
गुन्हे मागे घेण्याचा शब्द पाळावा
काही दिवसांपूर्वी वडगाव काशिंबेग येथे बैलगाडा शर्यती भरविल्यामुळे आयोजकांवर व बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावर आढळराव-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकार व मंत्रीमंडळ यांना खडे बोल सुनावले होते.
तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द पाळला नाही, याबाबतही नाराजी व्यक्त केली होती. त्याचाच परिणाम म्हणून राज्य शासनाने तातडीने मंत्रालयात बैठक बोलावून शासनाचे वकील ऍड. सचिन पाटील यांना सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत सुरू होत नाही. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्य शासनाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असून सरकारच्या प्रयत्नांना नक्की यश मिळून बैलगाडा शर्यती लवकर सुरू होतील.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार