ठाणे – ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना आज पहाटे राबोडी परिसरात घडली.
रमीज शेख (वय 32), गॉस तांबोली अशी मृतांची नावे आहेत. ठाण्यातील राबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही तळ मजला अधिक चार मजली इमारत आहे. आज पहाटे 6 वाजता सर्वजण साखर झोपेत असतानाच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला.
अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले. तर अचानक काही तरी पडण्याचा आवाज आल्याने इमारतीतील इतर लोक जागे झाले आणि त्यांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली.
त्यानंतर नागरिकांनी तात्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
रमीज शेख, गॉस तांबोली आणि अरमान तांबोली या तिघांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या तिघांनाही प्रचंड मार लागला होता. त्यामुळे उपचारादरम्यान रमीज शेख आणि गॉस तांबोली यांचा मृत्यू झाला. तर अरमान हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना घडल्यानंतर टीडीआरएफची टीम, आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच ही इमारत रिकामी करण्यात आली असून इमारतीतील नागरिकांना जवळच्या मशिदीत स्थलांतरीत करण्यात आले आहे.