नवी दिल्ली: राजस्थानातल्या कॉंग्रेस सरकारमध्ये पायलट आणि गेहलोत गटांमध्ये सध्या जो सत्ता संघर्ष सुरू झाला आहे त्याविषयी कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पक्षातील या घडामोडी चिंतीत करणाऱ्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तेथील हा पेच प्रसंग त्वरित सोडवला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून या विषयी पक्षाचे नेतृत्व कधी जागे होईल, अशी विचारणा सिब्बल यांनी केली आहे. तबेल्यातून घोडे निघून गेल्यावरच आपण जागे होणार काय, अशी विचारणा त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींना केली आहे.
राजस्थानात भाजपने सरकार पाडण्याचे प्रयत्न चालवले आहेत, त्यासाठी त्यांनी प्रत्येक आमदाराला पंधरा कोटी रुपयांची ऑफर दिली आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या दोन जणांना सरकारने अटक केली आहे.
या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार असून त्या चौकशीला हजर राहण्याची नोटीस उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना बजावण्यात आल्यानंतर त्यांनी गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारल्याची स्थिती आहे. त्या घडामोडींच्या संबंधात जाहीर प्रतिक्रिया देणारे कपिल सिब्बल हे पहिलेच ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आहेत.