नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा मागील अधिवेशनाच्या काळात रद्द केल्यानंतर तिथे तणावपुर्ण शांतता पहायला मिळत आहे. दरम्यान, हाच मुद्दा आज संसदेत काढण्यात आला आणि त्यावर जोरदार चर्चा करण्यात आली. राज्यातील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी इथली परिस्थिती संपुर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे.
HM Amit Shah, in RS: As far as internet services are concerned, the decision can be taken by the Jammu and Kashmir authorities. There are activities by Pakistan too in Kashmir region, so keeping security in mind, whenever the local authority deems it fit, a decision will be taken pic.twitter.com/bBpx2IgFSt
— ANI (@ANI) November 20, 2019
काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरून कॉंग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न आज करण्यात आले. तर गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यासाठी त्यांनी काही मुद्देदेखील सभागृहात सादर केले.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यास चार महिन्यांचा कालावधी होत आहे. काश्मीरमधील संपूर्ण परिस्थिती कधीपर्यंत सामान्य होईल? असा प्रश्न कॉंग्रेस खासदारांकडून विचारण्यात आल्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी यावर उत्तर देताना म्हटले की, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. केंद्र सरकराने घेतलेल्या निर्णयानंतर पोलिसांच्या गोळीबारात एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. शिवाय दगडफेकीच्या घटनांमध्येही घट झाली आहे.
याचबरोबर बॅंकांचे व्यवहार, शाळा, सरकारी कार्यालये, दुकानं व रुग्णालय देखील सुरळीत सुरू आहेत. सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठाही मुबलक प्रमाणात होत असल्याची माहिती अमित शाह यांनी यावेळी दिली. याचबरोबर ज्या भागात इंटरनेट सुविधा अद्याप सुरू झालेली नाही, त्या भागात लवकरात लवकर इंटरनेट सेवा सुरू केली जाईल, असेही शाह यांनी यावेळी सांगितले.