सातारा – गायनाला वयाचे बंधन नसून गायन क्षेत्र कुठल्याही वयात सुरू करता येते, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश क्षीरसागर यांनी केले. दीपलक्ष्मी पतसंस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या “अक्षर चांदणे’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे शहर प्रतिनिधी म. सा. प. पुणे, शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले, रमन रणदिवे, सौ. बिना रणदिवे, निलेश रणदिवे व शाखाधिकारी आग्नेश शिंदे आदी. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, गायन क्षेत्राची मला विद्यार्थी वयापासूनच आवड होती व त्याक्षेत्रामध्ये पुढे जायची इच्छा होती. परंतु कामाच्या व्यग्रतेमध्ये ते शक्य झाले नाही. प्रत्येकाला आवडणारी गोष्ट म्हणजे संगीत आहे. त्यात आवडणारा कुठलाही भाग आपण करायला हवा. आज या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
शिरीष चिटणीस म्हणाले, गझल हे माध्यम माणसांना जवळ आणण्याचे साधन आहे. माणसांना अंर्तमुख करण्यासाठी भाग पाडते. अकबर इलाबादी यांची गलाम अली यांनी गायलेली, हंगामा है क्यो बनता, थोडीसी तो पिली है, डाका तो नही डाला, चोरी तो नहीं कि है, ही गझल चिटणीस यांनी गायली. यानंतर “अक्षर चांदणे’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे स्वागत गीत विनया रजपूत हिने “मनकी बिना गुंजती ध्वनी मंगलम स्वागतम्….स्वागतम्….सुस्वागतम्’ या गाण्याने झाली. यानंतर रमण रणदिवे यांच्या विविध गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला.