बेल्हे (प्रतिनिधी) : आताच्या युगात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पण अशाही काळात अजित वाघमारे आणि संग्राम कांडेकर या दोन तरुणांनी सापडलेले ५० हजार रूपये प्रामाणिकपणे परत देण्याचे काम केले आहे.
सविस्तर बातमी अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील अजित काशीनाथ वाघमारे हे नारायणगाव येथील अहमदनगर जिल्हा बँकेत लिपीक म्हणून कार्यरत आहे. तर संग्राम प्रकाश कांडेकर हे दूध डेअरीचे अध्यक्ष आहे. हे दोघे गुरुवारी नारायणगव्हाण गावांवरून वाडेगव्हाण कडे कामानिमित्ताने चालले होते.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1279481202391582/
दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर त्यांना एक पिशवी पडलेली दिसली. थांबून पाहिले असता रोख रक्कम ५० हजार रुपये, महाराष्ट्र बँकेचे पासबुक आणि गोळ्या औषधे आढळून आले. त्यानंतर चौकशी केली असता शांताबाई अलभर यांची ती पिशवी असल्याची माहिती मिळाली. ही रक्कम महाराष्ट्र बँकेतून काढली होती. शिरूर येथे स्वतःच्या ऑपरेशन करता त्या जावया सोबत चालल्या होत्या. त्यावेळी घाईगडबडीत त्यांची पैशाची पिशवी पडली होती.
सदर घटनेची माहिती अजित वाघमारे व संग्राम कांडेकर यांनी नारायण गव्हाण येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके आणि बबनराव फुले यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला आणि सदरची रक्कम शांताबाई यांना परत केली. त्यामुळे या दोन तरूणांच्या प्रामाणिकपणाचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहेत.