ब्रिस्बेन – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने तीन गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून इतिहास घडवला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली.
अंतिम आणि चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने रिषभ पंत आणि शुबमन गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर 3 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाने चार सामन्यांची मालिकात 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र या विजयानंतर अजिंक्य रहाणेचा साधेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
Proud to be a part of this unit 🇮🇳 pic.twitter.com/bZZupXEAfE
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 19, 2021
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने विजयी भारतीय संघाचा फोटो ट्विट केला. त्याला रिट्विट करत अजिंक्यने म्हटले की, या टीमचा भाग होतो, याचा मला अभिमान आहे. वास्तविक पाहता रहाणे विजयी संघाचा कर्णधार होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात पहिली कसोटी गमावल्यानंतरही रहाणेने तीन कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व करत मालिकाविजयाची किमया करून दाखवली. नवीन खेळाडूंना संधी देण्याचे रहाणेचे धोरण सध्या कौतुकास्पद ठरत आहे.