न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी पाकिस्तानबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्याने संपूर्ण जगभरात एकच गोंधळ उडाला आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा धक्कादायक दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी केला आहे.
माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी त्यांच्या ‘नेव्हर गिव्ह एन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे. माईक यांनी पुस्तकात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये भारतानं बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन भारतीय सैन्यानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली होती. माईक यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करणार असल्याची माहिती त्यांना तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. त्यांनी सांगितलं की, 27-28 फेब्रुवारी 2019 मध्ये ही घटना घडली. तेव्हा ते अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोईला गेले होते. यानंतर त्यांच्या टीमनं नवी दिल्ली आणि इस्लामाबादशी चर्चा केली होती.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी याविषयी बोलताना, ‘भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अण्वस्त्र हल्ल्यापर्यंत येऊन पोहोचल्याच्या माहितीपासून जग पूर्णतः अनभिज्ञ होते. मला नाही वाटत की, कोणालाही याबाबत काहीही माहित होते. दरम्यान, फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. याच पार्श्वभूमीवर भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती.
माईक पॉम्पीओ म्हणाले की, ते हनोई, व्हिएतनाममध्ये असतानाची ती रात्र कधीही विसरणार नाहीत. त्यांनी सांगितलं की, मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याबाबत बोललो. पॉम्पीओ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना भारताकडून देण्यात आलेला संदेश दिला. परंतु, त्यावेळी बाजवा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत आमचा असा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केले होते. तसेच, तुमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती चुकीची असल्याचे सांगितल्याचेही माईक यांनी सांगितले आहे.
पॉम्पीओ यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही माहिती अथवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आम्ही जे केलं ते कोणताही देश करू शकत नाही, असा दावा माईक पॉम्पीओ यांनी केला आहे.