सुभाष देशमुख यांनी वर्तवले भाकित
उस्मानाबाद : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद निर्माण झाला आणि सेनेने आपली वेगळी चुल मांडली. परंतु, त्यांच्यातील हे वाद आता रोज नव्याने समोर येत आहेत. त्यातच आता माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सरकारवर टीका केली आहे.
गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने कायम जनहिताची कामे केल्यानेच राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिले होते. मात्र, शिवसेनेने भाजपची युती तोडून महाविकास आघाडी निर्माण केली. शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाळत नसून, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपदेखील सुभाष देशमुख यांनी केला. ते उस्मानाबादमध्ये आयोजित भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. दरम्यान, आगामी काळात जनता शिवसेनेला चांगलाच झटका देईल आणि शिवसेनेलाही भविष्यात युती तोडल्याचा मोठा पश्चाताप करावा लागणार असल्याचे भाकित त्यांनी वर्तवले.
भाजपची ध्येयधोरणे जनहिताची आहेत. हे राष्ट्र वैभवशाली होण्यासाठी शेवटचा माणूस विकासाच्या प्रवाहात कसा येईल? हे आमच्या पक्षाचे धोरण राज्यात राबविणे सुरू होते. शेतकरी हिताचीही अनेक कामे आम्ही केली. मात्र, सध्याच्या मंत्र्यांकडून सामान्यांची केवळ फसवणूक चालू असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जावून एक घोषणा करतात आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना वेगळीच भूमिका घेतात.
ठाकरे हे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचे बोलत होते. मात्र 2 लाखांची मदत देवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांनी केलेली कर्जमाफी सरसकट नाही, यामुळे आम्ही विधानसभेत गोंधळ करून निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांच्या एकाही मंत्र्यांनी ब्र शब्द काढला नाही. यामुळे जनतेची फसवणूक करणाऱ्यांचे सरकार जास्त काळ चालणार नसल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.