मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास आनंदच-राऊत
मुंबई -लोकसभा निवडणुकीत भाजपला कदाचित स्पष्ट बहुमतापासून दूर रहावे लागेल, अशी शक्यता वर्तवणारे त्या पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांच्या वक्तव्याशी मित्रपक्ष शिवसेनेने सहमती दर्शवली आहे. अर्थात, केंद्रातील पुढील सरकार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचेच असेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माधव यांच्या वक्तव्याची री ओढली. माधव म्हणाले ते बरोबरच आहे. मागील वेळेप्रमाणे भाजपला यावेळी एकट्याच्या बळावर 280 ते 282 जागांचा आकडा गाठणे तूर्त तरी खूप अवघड दिसते. अर्थात, भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरेल. एनडीए बहुमताचा आकडा पार करेल आणि पुढील सरकार स्थापेल, असे राऊत यांनी म्हटले.
पुढील सरकार स्थापण्यासाठी भाजपला मित्रपक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासेल, असेही माधव यांनी म्हटले होते. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, माधव यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. शिवसेना पुढील एनडीए सरकारचा भाग असेल. पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यास आनंदच होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.