आदित्य ठाकरे : आढळरावांच्या प्रचारार्थ उरुळी कांचन येथे सभा
सगळे नट-बोल्ट ढिल्ले करणार -शिवतारे
अजित पवार मला धमकी देतात की, विजय शिवतारे विधानसभेला कसा निवडून येतो तेच मी बघतो. त्याला नगरच्या साखर कारखान्यात नट-बोल्ट फीट करायला पाठवतो अस म्हणतात, पण मी त्यांना सांगू इच्छितो की, मी इंजिनियर आहे, मला नट-बोल्ट कसे आवळताही येतात आणि ढिल्ले करताही येतात. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या त्यांचे सगळे नट-बोल्ट मी ढिल्ले करणार, असा टोला विजय शिवतारे यांनी लगावला.
उरळीकांचन – शिवसेना-भाजपची युती ही स्वाभिमानाची युती आहे. शिवसेना-भाजप महायुतीने स्वाभिमान जागवत विकास केला. महायुतीचे खासदार जनतेसाठी काम करतात, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार, खासदार साखर कारखाने, शिक्षण संस्था यांचा उपयोग स्वतःचे खिसे भरण्यासाठी करतात. दिल्ली पुढे लोटांगण घालणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी देशाची, महाराष्ट्राची वाट लावली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उरळीकांचन येथे आयोजित केलेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार बाबुराव पाचर्णे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा प्रमुख राम गावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंड्रे, जि.प. माऊली कटके, माजी जि.प.सदस्य अशोक कसबे, काळुराम मेमाणे, सुनील कांचन, अजिंक्य कांचन, विकास जगताप, उरळीकांचनचे उपसरपंच संतोष कांचन, बाळासाहेब कांचन, नितीन कांचन, बापू तुपे, राजेंद्र बोरकर, आप्पा कड, स्वप्निल कुंजीर, विपुल शितोळे, भाजप शहराध्यक्ष श्रीकांत कांचन, तालुका संघटीका सविता कांचन, प्रतिभा कांचन आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, देशात 56 पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले सरकार तुम्हाला चालेल की, 56 इंच छातीची धमक असलेला पंतप्रधान चालेल? देशात भगवे वादळ उठले आहे. बारामतीचा मतदारसंघ वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे महायुती राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणारच. पाच वर्षांत आम्ही केलेला विकास जनतेला दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्प, आयटी पार्क, शहरातील मेट्रोसह विकासाचे विविध प्रकल्प आदी कामे आम्ही केली आहेत, असे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे यांचेही भाषण झाले.