मालेगाव,-आम्हीच खरी शिवसेना आहोत. या सरकारचे काही खरे नाही. ते लवकरच कोसळेल. भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे शिवसेनेत परत येतील. मात्र, एकनाथ शिंदेंना आम्ही घेणार नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
संजय राऊत यांच्या नाशिक व मालेगाव येथे सभा झाल्या. ते म्हणाले की, मला मालेगावला यायचेच होते. प्रकृती बरी नव्हती तरीही मी आलो. कारण मी ठरवले होते. जेव्हा मी ठरवतो की, एखाद्याला गाडायचे, तेव्हा ते मी करतोच. मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची जंगी सभा 26 तारखेला होणार आहे. त्यावेळी शिवसेनेची खरी ताकद दिसेल.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना गत 55 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली, त्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हायचे नव्हते. मराठी माणसांना सन्मान, स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी शिवसेना उभारली. जनतेने बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनाप्रमुखपद दिले. इलेक्शन कमिशनला विचारून शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली नाही. इलेक्शन कमिशनचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण काढू शकणार नाही.