बीड जिल्ह्यातील देवळाली पानाची या छोट्या खेडेगावात जन्मलेल्या बलभीम अण्णा यांना आईकडून संस्कार, कष्टाची शिकवण व वडिलांकडून आध्यात्माचा वारसा मिळाला. मजुरीकरत प्रतिकूल परिस्थितीत डी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ शिक्षकाची भूमिका स्वीकारत विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले.
मात्र यात अण्णांचे मन रमले नाही. त्यामुळे पोलीस खात्यात भारती झाले. मात्र तेथेही शांत न बसता परीक्षा देत बलभीम अण्णांनी प्रतिष्ठेच्या वायरलेस विभागात उच्च पद मिळविले. आणिबाणी काळातही प्रामाणिकपणे कर्त्यव्य बजावत भरीव योगदान दिले. मात्र सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या बलभीम अण्णांचे मन पोलीस खात्यातही रमले नाही.
त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन नगरला येऊन प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसाय व पेट्रोल पंप सुरू केला. सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे व्यवसाय करत यशाच्या शिखरावर पोहचले. त्यामुळे त्यांनी बीड व नगर जिल्ह्यांत नावलौकिक मिळविला. व्यवसायानिमित्त फिरताना ग्रामीण भागात मुलं मोठ्याप्रमाणात शिक्षणापासून वंचित असल्याचे बलभीम अण्णांना दिसले.
त्यामुळे आईच्या नावाने सौ. लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान सुरू करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ऊसतोड कामगार, शेतकरी, तसेच नगर शहरातील गरीब व गरजू मुलांसाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करून त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची दारे उघडी केली. रायतळे येथे वडील स्व. शांतानंद महाराजांच्या आश्रमात वर्षभर होणाऱ्या विविध धार्मिक सोहळ्यांत व राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या सप्ताहांमध्ये बलभीम अण्णा तन-मान-धनाने सहभागी होत. हजारोंना अन्नदान करत.
स्व. बलभीम अण्णांच्या मनात पूर्वीपासूनच पर्यावरण संवर्धनाची तळमळ होती. पर्यावरण संवर्धनाचे कार्य करण्यास त्यांनी अधिक वेळ देण्यास सुरवात केली. दुष्काळी भागाला प्राधान्य देत विदर्भापासून कोल्हापूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात फिरून वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ सुरू केली. बीजारोपण करून जर झाडे लावली, तर ते वृक्षारोपण अधिक फलदायी ठरते, हे त्यांना उमगल्यावर त्यांनी शास्त्रोक्त बीजारोपण करण्यासाठी सुमारे वर्षभर प्रयत्न करत “वनकाठी’ची निर्मिती केली.
या वनकाठीच्या माध्यमातून थेट जमिनीत खोलवर सोप्यापद्धतीने बीजारोपण होऊन झाडे उगवू शकतात, हे त्यांनी दाखऊन दिले. बलभीम अण्णांनी अनेक डोगरांवर, शेतात, जंगल चॉंदबीबी महाल, गोरक्षनाथ गड आदींसह शेकडो ठिकाणी विविध बहुपयोगी, औषधी, झाडांचे बीजारोपण उपक्रम शासनाच्या मदती शिवाय अनेक वर्षे राबविला.
आषाढी व कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विविध दिंड्यांमधील वारकरीही या वनकाठीद्वारे पंढरीच्या वाटेवर बीजारोपण करत असत. वनकाठीचा प्रसार व प्रचार या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झाला. बलभीम अण्णांनी केलेल्या बीजारोपण, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनच्या कार्याची दाखल राज्य शासनाने घेत त्यांना 2014 सालचा प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज “वनश्री’ पुरस्करने सन्मानित केले.
स्व. बलभीम अण्णांच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण. बहुपयोगी लक्ष्मीतरू या झाडाचे महत्त्व सर्वांना पटवून देत लक्ष्मीतरूच्या रोपणासाठी अण्णांनी अधिक आग्रही भूमिका घेतली. अरणगाव येथील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या भव्य जागेत हजारो लक्ष्मीतरू झाडांचे बन बलभीम अण्णांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले आहे.
त्यामुळे लक्ष्मीतरू व बलभीम अण्णा हे एक समीकरण झाले होते. वयाच्या साठीनंतर तब्येत साथ देत नसतानाही बलभिम अण्णांनी ही वृक्षारोपणाची चळवळ थांबवली नाही. यात संपूर्ण डोके कुटुंबीय अण्णांना मदत करत होते.
बलभीम अण्णांच्या अकस्मात निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. एक कर्तृत्वसंपन्न, कामाचा मोठा आवाका असणारे, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या विशाल वटवृक्षाची सावली आज हरपली आहे.
मात्र स्व. बलभीम अण्णांच्या पश्चात त्यांची आई लक्ष्मीबाई, बंधू बापूसाहेब डोके, सौ. आशादेवी, मुले ऍड. शिवजित डोके व ऍड. प्रसाद डोके यांच्यासह स्नुषा सौ. रेखा व सौ. दीपाली, पुतण्या महेश, नातू अभयसिंह, अमरसिंह, उत्कर्षा, पूनम, पूजा लोखंडे हे सर्वजण वनश्री बलभीमअण्णांनी दाखवून दिलेल्या वाटेवर पुढे चालत त्यांचा हा समाजसेवा, पर्यावरण संवर्धनाचा व उद्योगाचा वारसा जपतील.
पोलीस खात्यासारख्या कणखर सेवेत असतानाही हृदयात सतत वृक्षांविषयी प्रेम जपत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे, दुष्काळी ग्रामीण भागातूनवर आलेले, समाजसेवेची आवड व वारकरी संप्रदायाचा वारसा जपत गेल्या 3 दशकांपासून नगर व बीड जिल्ह्यांत क्रांतिकारक काम करत समाजापुढे कृतियुक्त आदर्श ठेवेणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, वृक्षांचे कैवारी वनश्री बलभीम अण्णा डोके यांचे 4 जुलै रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला दिलेला हा उजाळा.