नवी दिल्ली – देशात गंभीर बनलेली कोळसा टंचाईची तीव्रता कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोळशाचा साठा आणि पुरवठा वाढवून वीज संकट टाळण्यावर केंद्र सरकारनेही भर दिला आहे.
मागील काही दिवसांपासून कोळसा टंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोळशाच्या साठ्यात लक्षणीय घट झाल्याने अनेक औष्णिक प्रकल्पांमधील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झाला. त्यातून काही राज्ये अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली.
संभाव्य संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावरून वेगाने हालचाली सुरू झाल्या. आता कोळसा साठा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आठवडाभरापूर्वी 69 वीज प्रकल्पांमध्ये चार दिवस पुरेल इतकाही कोळसा साठा उपलब्ध नव्हता. आता तशा प्रकल्पांची संख्या घटून 58 इतकी झाली आहे. इतर वीज प्रकल्पांमधील कोळसा साठ्यातही सुधारणा झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंह आणि रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली. कोळसा साठा आणि पुरवठा वाढवण्याच्या पर्यायांची चाचपणी त्यांनी केल्याचे समजते.