निर्गुंतवणुकीविरोधात भारतीय मजदूर संघाचे आंदोलन
पुणे – देशभरामध्ये अनेक वर्षांपासून अंगणवाडीत महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.
अंगणवाडीतच काम करणाऱ्या महिला नाहीतर अशा शाळेतील जेवण तयार करणारे कर्मचारी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लोकांनाही सरकारी नोकर समजून त्यांना योग्य सुविधा देण्याची गरज असल्याचे संघाने शनिवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी राज्य आणि केंद्र सरकारच्या कानावर आपले गाऱ्हाने मांडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारचे धोरण सरकारी उद्योग आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात असल्याबद्दल भारतीय मजदूर संघ पुढील शुक्रवारी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करणार आहे. या आंदोलनात निर्गुंतवणूक खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या नकारात्मक धोरणाविरोधात आवाज उठवण्यात येईल. हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. देशातील सर्व नोकऱ्याचे रूपांतर कंत्राटी नोकऱ्यांत किंवा मर्यादित कालावधीच्या नोकऱ्यात केले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे. कंत्राटी कामगार, मर्यादित कालावधीसाठी ठेवलेले कामगार, दैनंदिन कामगार, अस्थायी कामगार या सर्वांना रोजगाराची सुरक्षा मिळण्याची गरज असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
त्याचबरोबर सरकारी कंपन्या योग्य पद्धतीने काम करत असूनही निर्गुंतवणुकीद्वारा त्यांचे खासगीकरण केले जात आहे. त्यामुळे एकूणच देशातील औद्योगिक वातावरण अशांत झाले आहे. भारतीय मजदूर संघाने थेट परदेशी गुंतवणुकीला ही विरोध केलेला आहे. ही गुंतवणूक थांबवण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रातही खासगी गुंतवणूक वाढत असल्याबद्दल संघाने चिंता व्यक्त केली आहे.