चेन्नई – भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेला येत्या शुक्रवारपासून पहिल्या कसोटीने प्रारंभ होत आहे. चेन्नईच्या मैदानावर या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने होत आहेत. जर या दोन संघांतील कामगिरीचा आढावा घेतला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी दर्जा मिळाला तेव्हा सुरुवातीला भारतीय संघ अपयशी ठरला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात इतिहास भारतीय संघाच्या बाजूने आहे, असेच स्पष्ट होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील 122 कसोटी सामन्यांत 47 सामने इंग्लंडने आणि 26 सामने भारताने जिंकले आहेत. गेल्या दशकात 23 कसोटी सामन्यांपैकी 13 सामने इंग्लंडने जिंकले आहेत, तर 7 सामने भारताने जिंकले आहेत.
2016-17 साली इंग्लंडला भारताकडून 4-0 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, तर 2018 साली इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 4-1 अशी गमावली होती. भारतात झालेल्या 60 कसोटी सामन्यांपैकी 19 भारताने तर 13 इंग्लंडने जिंकल्या आहेत.
चेपॉक भारतासाठी लकी….
चेन्नईमध्ये भारतीय संघाने खेळलेल्या 32 कसोटींपैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर भारतीय संघाला 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध नोंदवलेली 7 बाद 759 ही धावसंख्या सर्वोत्तम ठरली आहे.