नगर – विविध कारणांनी बहुचर्चित असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात रोज नवनवीन सुरस कथा सुरु असतात. दोन पैकी एक जागा रिक्त असलेल्या उपशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार चक्क सर्वात कनिष्ठ असलेल्या विस्तारधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. अन् सर्वात वरिष्ठ विसतारधिकाऱ्याला मात्र या प्रक्रियेत जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. सात विस्तारधिकाऱ्यांमधील सर्वात कनिष्ठाकडे पदभार देण्यामागे त्यांच्यावर कुणाची कृपादृष्टी आहे याची चर्चा शिक्षण विभागात सुरु आहे.
चार-पाच महिन्यापासून या उपशिक्षणाधिकारीपदाचा पदभार कनिष्ठ विस्तारधिकाऱ्यांकडे असून त्यांनी पण पदावर काम करण्यास असमर्थता दर्शविली असतानाही त्यांच्याकडे पदभार ठेवण्यात शिक्षण विभागाला कोणते स्वारस्य आहे हे अनाकलनीय आहे. सध्या पूर्णवेळ नियुक्त असलेले दुसरे उपशिक्षणाधिकाऱ्यांना पुढील दोन महिन्यात शिक्षणाधिकारी पदाची बढती मिळणार आहे. त्यामुळे त्यांची जागाही रिक्त होणार आहे. पूर्णवेळ उपशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाला करण्यास विलंब लागत असेलही पण किमान त्या जागांचा पदभार किमान अनुभवी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक आहे.
विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी निगडीत असणाऱ्या या महत्त्वपूर्ण विभागात कुणालाच कुणाचा ताळमेळ नसतो. सरकारी बाबू विविध कारणे देत लोकांची कामे रखडून ठेवत असतात. याकडे लख द्यायला ना वरिष्ठांना वेळ आहे ना पदाधिकाऱ्यांना… सर्वांची
स्वतःच्या सोयीनुसार सावळा गोंधळ सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मुख्यालयाचा व जिल्ह्यातील पंचायत समितीच्या स्तरावरील शिक्षण विभागाचा डोलारा हा बहुतेक ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच आहे.