मुंबई – महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे जागतिक शेअर बाजारात विक्रीचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजार निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आठवड्यात शेअर बाजारात बरीच विक्री झाली. गुरुवारीही विक्रीचा जोर कायम राहून निर्देशांकात घट नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 372 अंकांनी कमी होऊन 59,636 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.75 टक्क्यांनी म्हणजे 133 अंकांनी कमी होऊन 17,764 अंकांवर बंद झाला. गेल्या तिन दिवसापासून निर्देशांक कमी होत आहेत. आज माहिती तंत्रज्ञान व वाहन क्षेत्राची मोठी हाणी झाली.
इन्फोसिस, टीसीएस, महिंद्रा, टाटा स्टील, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर स्टेट बॅंक, पावर ग्रिड, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
करोनाच्या काळात भारतीय रिझर्व बॅंकेसह इतर देशातील रिझर्व बॅंकांनी भांडवल उपलब्ध करून व्याजदरात कपात केली होती. त्यामुळे बाजारातील खेळता पैसा वाढून महागाई वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत भांडवलाचा वापर कमी होऊन कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम होऊ शकतो असे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण आहे. बऱ्याच देशांनी प्रयत्न करूनही क्रूडचे दर वाढतच असल्यामुळे इंधनाचा खर्च वाढणार आहे. त्याचा बराच फटका भारताला बसून शकतो.