मुंबई – महाविकास आघाडीमधील अनेक महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढून शिंदे सरकारने विरोधकांना मोठा धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा काढलेल्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा समावेश आहे.
वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, नगरहरी झिरवळे, सुनील केदारे या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. इतर नेत्यांची सुरक्षा काढली असताना मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना काॅंग्रेसचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे की, विरोधी पक्षातील व्यक्ती असो अथवा सर्वसामान्य, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. कुणाला सुरक्षा देणे, न देणे ही सरकारची जबाबदारी आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये याची काळजी सरकारने घ्यावी. सरकारने आमची सुरक्षा कमी केली, त्याला विरोध करण्याचं कारण नाही. सरकारला वाटतेय की आम्हाला सुरक्षा द्यायची गरज नाही, तर आम्हाला काहीही अडचण नाही, सरकारला आलेल्या रिपोर्ट्सनुसार नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केली असेल, असेही पटोले यांनी म्हंटले आहे.