मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नसून सर्व व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. तसेच या वर्षीचा विकास दर हा 9.5 टक्के राहिल असाही अंदाज व्यक्त केला आहे. या आधी तो 10.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. आरबीआयने आपल्या सलग सहाव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत.
जून आणि जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठकीनंतर द्विमासिक पतधोरणाची घोषणा करण्यात आली आहे. रेपो दर किंवा बँकांशी संबंधित अन्य बाबतीमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. रेपो दर चार टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.
सलग सहाव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रिझर्व्ह रेपो रेट आणि कर्ज दरसुद्धा ३.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. केंद्रीय बँकेने अर्थव्यवस्थेचा वाढीचा अंदाजित टक्केवारी आधीपेक्षा एका टक्क्यांनी कमी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था ९.५ टक्कांचा विकासदर साधेल असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. आधी हा दर १०.५ असेल असे सांगण्यात आले होते. मात्र कोरनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आर्थिक विकासाला बसल्याने या विकासदरामध्ये एका टक्क्यांनी घट करण्यात आली आहे.
पतधोरण समितीची या आर्थिक वर्षातील ही दुसरी बैठक होती. रिझर्व्ह बँकेने ५ मे रोजी रोकड सुलभतेचे नियमन करण्यासाठी विविध उपाय जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेने नुकताच नऊ महिन्यांच्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला असल्याने या बैठकीचे प्रासंगिक महत्त्व तसे कमीच असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. आरबीआयने मार्जिनल स्टॅण्डींग फॅसिलीटी म्हणजेच एमएसएफ दर ४.२५ टक्क्यांवर कायम ठेवले असून आवश्यकता असेल तोपर्यंत हे दर स्थिर ठेवले जातील असे दास यांनी स्पष्ट केले आहे.