मुंबई – महाराष्ट्रात येत्या 15 फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. आरोग्य क्षेत्रातील ज्या व्यक्तींना पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली आहे त्यांना या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण केले जाणार आहे. करोना विरोधातील लसीचे दोन डोस काही अंतराने घ्यावे लागतात.
त्यातील हा दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण चार आठवड्यात पुर्ण केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निश्चीत केलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार हे लसीकरण केले जात आहे असे राज्य सरकारने म्हटले आहे.
काल शुक्रवार पर्यंत राज्यातील 6 लाख 48 हजार 573 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड विरोधी लसीचा पहिला डोस देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. देशात 16 जानेवारी पासून करोनाची लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून टप्याटप्याने देशभर हे लसीकरण केले जाणार आहे.