अहमदनगर – समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिर्डी ते भरवीर असा हा टप्पा आहे. शिर्डी ते भरवीर अंतर केवळ ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज कोपरगाव येथील पथकर प्लाझा येथे दुपारी अडीच वाजता होणार आहे.
मागील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले होते.
आज लोकार्पण होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ आणि ६ वे- ब्रिज या सुविधांचा समावेश असणार आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा ८० किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र #समृद्धी महामार्गाचे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. ८० कि.मी. लांबीच्या या टप्प्याच्या उद्घाटनानंतर ७०१ कि.मी पैकी आता ६०० कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
आज लोकार्पण होत असलेल्या… pic.twitter.com/vxSmKhFceI
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 26, 2023
शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. २०२४ पर्यंत समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचे सरकारचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे.