पालेकेल्ले – भारताचा महिला संघ यजमान श्रीलंका महिला संघाविरुद्ध आज (सोमवार) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी तसेच या सामन्यातही विजय मिळवत मालिका जिंकण्यासाठी सज्ज बनला आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताच्या महिला संघाचे 4 गडी राखून जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता हा दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.
हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 171 धावांवर रोखत 6 गड्यांच्या मोबदल्यात आवश्यक धावा पार करत विजयी सलामी दिली होती. मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या काही मर्यादाही उघड झाल्या होत्या. सलामीवीर व स्टार फलंदाज स्मृती मानधना अद्याप मोठी खेळी करू शकलेली नाही.
सलामीवीर शफाली वर्माही खेळपट्टीवर स्थिरावल्यावर अनावश्यक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद होत आहे. एकूणच टी-20 असो किंवा ही एकदिवसीय मालिका यांत कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रीक्स, हरलिन देओल व दीप्ती शर्मा यांनीच सातत्य दाखवले आहे. त्यामुळे आता या लढतीत प्रमुख खेळाडू भरात येत जबाबदारीने खेळी करणार का याकडेच लक्ष राहणार आहे. आता दुसरा सामना प्रमुख खेळाडूंसाठी महत्त्वाचा असून, मानधनासह पहिल्या तीनही फलंदांजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे श्रीलंकेचा संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी सराव सत्रात कसून मेहनत घेत आहे. त्यांची कर्णधार चमारी अटापट्टू सातत्यपूर्ण कामगिरी करत असून, तिच्यासह हर्षिता मडवी, हसिनी परेरा, नीलाक्षी डीसिल्व्हा, अनुष्का संजिवनी व कविशा दिलहारी यांना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना अत्यंत योजनाबद्ध गोलंदाजी करावी लागणार आहे.
शफालीवर मदार
स्मृती मानधनासह प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना सलामीवीर शफाली वर्मावरच आक्रमक सुरुवात करून देण्याचे आव्हान आहे. ती सराव सत्रात कसून सराव करत असली तरीही तिला चांगल्या सुरुवातीनंतर त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आलेले नाही. त्यामुळे आता तिच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.