नगर (प्रतिनिधी) – मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार (सोमवार) उद्यापासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याला असलेल्या गळतीचे सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करण्याचे यावेळी ठरले.
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृह येथे आज बैठक झाली. या बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे, सायली पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीला उन्हाळी आवर्तन पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रविवारपर्यंत 6 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात आले आहे. आवर्तन 47 दिवस सुरू असूनही पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टेलच्या 500 हेक्टर क्षेत्र अद्याप ओलिताखाली आणायचे आहे. आवर्तनाला गॅप न दिल्याने 650 दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार आहे. दुसऱ्या उन्हाळी आवर्तनासाठी चार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात येणार आहे.