नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये नवोदित खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने केले. भारतीय संघाचा सेकंड बेंच भक्कम असल्याचेच दिसून येत आहे, अशा शब्दांत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी याने आपले मत व्यक्त केले आहे.
नेटमध्ये प्रमुख फलंदाजांना सराव देणाऱ्या नेट गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. भारताचा सेकंड बेंच गुणवान असून प्रमुख खेळाडू निवृत्त झाल्यानंतरही संघ भक्कमच राहील, असेही शमी म्हणाला.
शमीसह ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे शार्दुल ठाकूर, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या नेटमध्ये सराव देण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या गोलंदाजांना अनपेक्षितपणे भारतीय संघात संधी मिळाली आणि या सर्वांनी संधीचे सोने केले.
आम्ही निवृत्त झालो तरीही आमचे वारसदार ठरलेले असतील.
या नवोदित गोलंदाजांना जितकी जास्त संधी मिळेल, तितके ते अनुभवी होतील. एखादा चांगला गोलंदाज निवृत्त झाला तरी भारतीय संघाला फारसा फरक पडणार नाही, कारण भारताची दुसरी फळी सक्षम आहे. संघनिवडीत त्यांना सातत्याने स्थान देण्यासाठी प्रयोग केले गेलेच पाहिजेत, असेही शमी म्हणाला.
नवोदितांकडे अफाट गुणवत्ता
शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, टी. नटराजन, शुभमन गिल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर या नवोदित खेळाडूंकडे अफाट गुणवत्ता आहे. त्यांनी प्रत्येक संधीचा योग्य लाभ घेतला आहे. यातूनच त्यांना अनुभव मिळणार असून, त्यांच्या रूपाने भारतीय संघाला भविष्यातील स्टार मिळाले आहेत, असेही शमी म्हणाला.