यवत – दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील जयहिंद विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आरसीसीमध्ये बांधकाम सुरू असलेली स्वागत कमान शनिवारी (दि.7) रात्री 10 च्या सुमारास ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाडली असून तीन संशयितांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
याप्रकरणी दिलीप हरिभाऊ आखाडे, बापु आनंदा ठोंबरे, मयूर सुरेश आखाडे (सर्व रा. कासुर्डी, ता. दौंड) असे तक्रार दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कमान पाडल्या प्रकरणी ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे संचालक सोपान लक्ष्मण गायकवाड (वय 60, रा. कासुर्डी, ता. दौंड) यांनी आज (दि.10) संशयीता विरोधात तक्रार दाखल केली आहे. कासुर्डी येथे गेली 30 वर्षांपासून जयहिंद विद्यालय सुरू असून येथे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कमान व वाल कंपाऊंड बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कमानीचे आरसीसीमध्ये 17 फूट लांब व 20 फूट उंच, असे बांधकाम केले होते. मात्र, तीन संशयितांनी दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने आरसीसीमध्ये बांधकाम केलेली कमान (दि.7) रात्रीच्या वेळी पडली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. सोपान गायकवाड यांच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी तीन संशयितांविरोधात कमानीचे नुकसान केल्याने तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार लोणकर करीत आहेत.