संरक्षण मंत्रालयाची घोषणा : लवकरच बैठक
पुणे – केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आता कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरिकांनाही लागू होणार आहे. संरक्षण मंत्रालयातर्फे नुकतेच यासंदर्भातील घोषणा करण्यात आली असून, लवकरच या संदर्भात देशातील सर्व कॅन्टोन्मेंट आणि पदाधिकारी यांची बैठक घेतली जाणार असल्याचेही मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.
पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत संरक्षण सचिव अजयकुमार यांच्यासमोरदेखील लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून, खुद्द केंद्रीय संरक्षण सचिव अजयकुमार यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून देशभरातील 62 कॅन्टोन्मेंटमध्ये केंद्र सरकारच्या योजना लागू करण्याचा निर्णय करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
संरक्षण मालमत्ता विभागामार्फत या योजना राबवण्यात येणार असून, 17 एप्रिल रोजी सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच संरक्षण मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये या योजना राबवण्याबाबत माहिती दिली जाणार असल्याचेही अजयकुमार यांनी सांगितले.
दरम्यान, हा अतिशय चांगला निर्णय असून, या योजनांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास, उज्वला, आयुष्मान भारत अशा विविध योजनांना लाभ मिळणार असल्याची भावना बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
165 योजनांचा मिळणार लाभ
केंद्र सरकारतर्फे आरोग्य, शिक्षण, निवास, पायाभूत सुविधा निर्मिती अशा विविध क्षेत्राशी निगडित सुमारे 165 योजना राबवण्यात येतात. यामुळे त्या प्रदेशाचा विकास होण्यास अधिक हातभार लागतो. मात्र, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डांना या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे देशभरातील 62 बोर्डांकडून केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली जात होती.