सातारा – सातारा शहरातील व्यापारी संघटना बुधवारी (दि. 29) होणाऱ्या “भारत बंद’मध्ये सहभागी होणार नाहीत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली. “बंद’मुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून प्रशासनाने आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, आंदोलन असते ते सरकारच्या निर्णयाविरोधात. या आंदोलनांमध्ये कारण नसताना सामान्य जनता व व्यावसायिक भरडले जात आहेत. याच विषयासाठी दि. 24 जानेवारी रोजी “बंद’ पाळण्यात आला होता.
त्यावेळी व इतर “बंद’वेळी दुरान्वयानेही व्यापाऱ्यांचा संबंध नसताना व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. प्रकाश गवळी, गुरुप्रसाद सारडा, अजित शहा, नीळकंठ पालेकर, भरतशेठ राऊत, राजेंद्र कासट, महेश लोया, सुदीप भट्टड, अशोक बादापुरे, अजय देवी, संजय भोईटे, विजय येवले, सुशांत नावंधर, विश्वास भोईटे, राजू भोसले, नंदकुमार बेनकर यांनी “बंद’ मध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. दि. 29 रोजी होणाऱ्या “बंद’मध्ये व्यापारी संघटना सहभागी होणार नसल्याने पोलिस व जिल्हा प्रशासनाने आम्हास संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.