नंदगोपाल वैद्य यांचे मत : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेचे भोसरीत लघु अधिवेशनभोसरी, दि. 17 (वार्ताहर) – जेथे गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ असेल तीच उद्योगसंस्था जागतिक स्पर्धेत टिकेल, असे प्रतिपादन टाटा मोटर्स समूहाचे महाव्यवस्थापक नंदगोपाल वैद्य यांनी केले.
भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने 52 वे लघु अधिवेशन संपन्न झाले. त्यात क्वालिटी सर्कल आणि अलाईड कन्सेप्टस या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक सुवर्णपदके तळेगाव येथील जेसीबी इंडिया उद्योग समूहातील स्पर्धकांनी पटकाविली. अहमदाबाद, अहमदनगर, शिरवळ, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातून 30 उद्योग समूहातील 375 जणांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदगोपाल वैद्य बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, सदस्य सुधीर अवचारे, प्रदीपकुमार, भूपेश मॉल उपस्थित होते.
यावेळी झालेल्या स्पर्धेत 54 सुवर्ण, 27 रजत व 8 कांस्यपदके विविध उद्योग समूहांनी पटकाविली. नंदगोपाल वैद्य पुढे म्हणाले, गेल्या 100 वर्षात जगभरात गुणवत्ता चळवळीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती झाली आहे. आज भारतीय बाजारपेठ जगातील सर्व कंपन्यांनी खुली झाली आहे. या जीवघेण्या स्पर्धेत आपणास टिकायचे असेल तर, गुणवत्ता व्यवस्थापनाच्या मदतीने उत्पादकाने वास्तविक दृष्टिकोनातून आपले योगदान आणि ग्राहकाच्या अपेक्षा यांच्यातील दरी मिटविणे गरजेचे आहे. ज्ञानवृद्धीसाठी अनेक मार्ग खुले आहेत. त्याची कास प्रत्येकाने अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन जेसीबी इंडिया उद्योग समूहाचे मनुष्यबळ विभाग उपाध्यक्ष एच. आर. मगपल्लीवर यांच्या हस्ते झाले. डॉ. रजनी इंदुलकर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे परीक्षण आर. संतोषकुमार, हनुमंत बनकर, शैलेश तुपे, पराग आपटे, दीपक कासार, रणजीत जाधव, किरण इचलकरंजी, प्रदीपकुमार, अजय कुटे, भूपेश मौल यांनी केले. सूत्रसंचालन ललिता परदेशी, पवनकुमार रौंदळ यांनी केले. तर संयोजन चंद्रशेखर रुमाले, प्रशांत बोराटे यांनी केले.