मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने एक महत्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, राज्यात आता सुट्यारीतीने कुठेही पान बिडी, सिगारेट विकायला बंदी घालण्यात आली आहे. एक वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
राज्यात अनलॉकमध्ये अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. अशातच आरोग्य विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे. राज्यात सुटी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. मात्र, यावर निर्णय होऊ शकला नव्हता. यासाठी विधी व कायदा विभागासह सरकारकडे आरोग्य विभागाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय विधी विभागाकडून देण्यात आला नव्हता.
‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) नुसार सिगारेटच्या पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनाकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्यास धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला. पण, आता अनेक पानटपऱ्यांवर सिगारेटच्या पाकिटातून एक-एक सिगारेटची आणि बिडीची विक्री केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सुट्टी सिगारेट आणि बिडी विक्रीवर बंदी आणावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने विधी व न्या विभागाकडे पाठवला. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष म्हणजे, अनेक राज्यात असा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा राज्यात असा निर्णय व्हावा यासाठी आग्रही होते. त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर 24 सप्टेंबरपासूच राज्यातील कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, जर सिगारेट किंवा बिडी विकत घ्यायची असेल तर यापुढे संपूर्ण पाकिटच खरेदी करावे लागणार आहे.असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.