बंगळुरू – कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार केएस ईश्वरप्पा पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून चर्चेत आले आहेत. ईश्वरप्पा यांनी सोमवारी म्हटलं की, आरएसएसचा ध्वज एक दिवस राष्ट्रध्वज बनेल यात शंका नाही. भगवा हे त्यागाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. त्याच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ईश्वरप्पा पुढं म्हणाले की, हजारो वर्षांपासून लोकांना भगव्याबद्दल आदर आहे, म्हणूनच आरएसएस भगव्या ध्वजसमोर प्रार्थना करते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार के.एस. ईश्वरप्पा यांनी यापूर्वीही अनेकवेळा भगव्या ध्वजाबद्दल वक्तव्य केले आहे. भविष्यात तिरंग्याची जागा भगवा ध्वज घेईल, असे ईश्वरप्पा यांनी याआधीही सांगितलं होतं. येत्या काळात लाल किल्ल्यावर भगवा फडकणार आहे. तथापि, यास वेळ लागू शकतो, असंही ते म्हणाले.
ईश्वरप्पा हे कर्नाटकचे तेच नेते आहेत ज्यांच्यावर एका कंत्राटदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ईश्वरप्पा यांनी कंत्राटदाराकडून कमिशन मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. याविषयी ठेकेदाराने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर सुनावणी न झाल्याने नाराज ठेकेदाराने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे ईश्वरप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.