सांगली – राज्यातील सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. सांगली जिल्हाच्या दौऱ्यावर असणारे पवार तासगाव तालुक्यातील आरवडेत बोलत होते. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्रीमंडळात एकही महिला नाही –
“सरकारच काय चाल्लंय? आम्ही आर. आर. आबा अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली आहे, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. 50 खोके सरकार ओके ही यांच्या कामाची पद्धत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला नाही, महिलांना का घेत नाही? तुमच्या पोटात दुखते का? मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाहीये, अनेकांना मंत्रीपदाचे गाजर दाखवले गेलंय, असेही पवार यांनी म्हटले आहे.
साखर धोरणावर सडकून टीका –
केंद्राच्या साखर निर्यात धोरणावरही पवारांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशचा फायदा केला. आम्ही ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला, तर राज्याच्या शेतकऱ्यांना 600 रूपये अधिकचा दर मिळेल, परंतू, आमच्या शेतकऱ्यांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत आहे.