आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कसोटीचे क्षण येत असतात. हे कसोटीचे क्षण आपल्या जीवनातील परीक्षेचा काळ असतो. एखादी अवघड प्रश्नपत्रिका हाती पडावी आणि चक्रावून जावे असे काहीसे घडते. अशावेळी आपण द्विधा मनस्थितीत असतो. एकतर ताबडतोब प्रतिक्रिया देऊन रिकामे होतो किंवा अनेकदा त्या कसोटीस न उतरता गिव्ह अप (हार मानतो) करतो. यातही ताबडतोब दिलेली प्रतिक्रिया फलदायी जरूर ठरते. परंतु बऱ्याचदा ताबडतोब प्रतिक्रिया अजून एखादे संकट किंवा कसोटीचा प्रसंग आपल्यासमोर आणून ठेवते आणि दुसरे म्हणजे सोडून देणे किंवा गिव्ह अप करणे. यातून काहीही साध्य होत नाही.
आपण आव्हानांचा सामना करू शकलो नाही, संधीचे सोने करू शकलो नाही याची खंत मात्र मनात कायम सलत राहते. मग अशा कसोटीच्या क्षणी या दोन पर्यायांशिवाय अजून करायचे तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. परंतु यावरही उत्तर आहे आणि ते म्हणजे संयमाचा नियम समजून घेणे. परिस्थिती कशीही असो त्या प्रतिकूल परिस्थितीत सर्वकाही व्यवस्थित होईल ह्या आशेवर शांतपणे आपले कर्म करत राहणे म्हणजे संयम. आव्हानांनी समोर ठिय्या मांडलेला असतानाही स्वतःचा तोल ढळू न देणे व केवळ अंतिम ध्येयाकडे लक्ष देऊन शांत राहणे म्हणजे संयम. यावर भगवान बुद्धांची वाचनात आलेली एक गोष्ट आपल्याला संयम कसा कामी येतो हे सांगून जाते.
एकदा गौतम बुद्धांचा एक अनुयायी त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, “”मला कोणत्याही कामात यश येत नाही. मी काही करायला गेलो की वाटेत संकटे येतात आणि मग मला ते काम सोडून द्यावे लागते.” भगवान बुद्ध त्या अनुयायाला सोबत घेऊन प्रवासाला निघाले. खूप चालल्यावर त्यांना तहान लागली. चालत चालत ते एका तलावाजवळ येऊन पोहोचले. त्यावेळी तो अनुयायी बुद्धांसाठी पाणी आणायला तलावाजवळ गेला. त्या पाण्याजवळून नुकतीच एक बैलगाडी गेली होती. त्यामुळे ते पाणी गढूळ झाले होते. त्या अनुयायाला प्रश्न पडला की इतके गढूळ पाणी बुद्धांना कसे प्यायला द्यायचे. तो रिकाम्या हाती बुद्धांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, “”तलावाचे पाणी खूप गढूळ आहे त्यामुळे ते पिण्यायोग्य नाही.” बुद्ध शांत राहिले.
थोड्या वेळाने बुद्धांनी त्याला पुन्हा पाणी आणायला सांगितले. तो पुन्हा रिकाम्या हाती परत आला आणि म्हणाला, “”अजूनही ते पाणी निर्मळ झाले नाही’. बुद्ध शांत राहिले. पुन्हा काही वेळाने त्यांनी त्याला पाणी आणायला पाठविले. आता मात्र ते पाणी निर्मळ दिसत होते. सारी माती पाण्याच्या तळाशी बसली होती. बुद्धांनी अनुयायाला समजावून सांगण्यास सुरुवात केली. ते त्याला म्हणाले, “”तू पाणी स्वच्छ करण्यासाठी काय केलंस?’ तर त्या पाण्याला तसेच सोडून दिलेस त्यामुळे त्यातील माती आपोआप तळाशी जाऊन बसली आणि त्यामुळे पाणी स्वच्छ झाले.
यावेळी तुझा संयम कामी आला. तुझे पण तसेच आहे. एखादे आव्हान आले की तुझे मन अशांत होते आणि त्यातून तुला स्वतःला त्रास होतो. अशावेळी त्या अशांत,असंयमी मनाला तसेच सोडून देत जा. काही वेळाने ते आपोआप स्थिर होईल आणि यातूनच तुझी कामे मार्गी लागतील. शिष्याला बुद्धांचे म्हणणे पटले आणि स्वतःची चूकही लक्षात आली. आपल्या जीवनातही असे प्रसंग घडत असतात. जे आपला कस लावत असतात. आपल्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी संयमाने केलेली कृती आणि घेतलेला निर्णयच आपल्याला योग्य मार्ग दाखवित असतो.
संयमाचे नियम स्वनियंत्रण
संयम वाढविण्याच्या नियमातील प्राथमिक मूलभूत गोष्ट म्हणजे स्वनियंत्रण. आव्हानात्मक काळात आपले आपल्या मनावर, भावभावनांवर नियंत्रण असायला हवे. यासाठी आपण नियमित योगा, प्राणायाम, ध्यान करायला हवे. यातूनच आपण आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. परिणामी स्वनियंत्रणातून संयम राखणे सोपे जाते.
आत्मविश्वास व सकारात्मकता
बरेचदा न्यूनगंडाच्या किंवा अपयशाच्या अपराधी भावनेतून संयम तुटत असतो. अशावेळी आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढविणाऱ्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी सकारात्मक ऐकणे, वाचणे, बोलणे आणि आत्मविश्वासाच्या नजरेने पाहता आले पाहिजे.
प्रतिक्रिया नाही प्रतिसाद देणे
कोणत्याही मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीबाबत भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नये. त्यातून तोटेच होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी शांत राहून संयमाने प्रतिसाद द्यावा. योग्य निर्णयासाठी स्वतःच्या मनाशी संवाद करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. यातून नक्कीच संयम वाढीस लागतो. लक्षात ठेवा संयमाचे हे नियमच आपल्याला यशाची आणि व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सुस्पष्ट करून देणार आहेत.
सागर ननावरे