अर्जासाठी आता कोणतीही मुदतवाढ नाही : प्रवेशाची लॉटरी 11, 12 मार्चला काढण्यात येणार
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी पालकांना अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी (दि.4) संपली आहे. आता अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
“आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत शाळांची नोंदणी केली. या मुदतीत राज्यातील 9 हजार 331 शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यानंतर पालकांना आपल्या मुलांचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी 11 ते 29 फेब्रुवारी अशी मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती.
संभाव्य वेळापत्रकानुसार प्रवेशाची लॉटरी 11, 12 मार्च रोजी काढण्यात येणार आहे. लॉटरी लागणाऱ्या पालकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करणे व शाळेत जावून प्रवेश निश्चित करण्यासाठी 16 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीची मुदत देण्यात येणार आहे.
यंदा 2 लाख 93 हजार 135 अर्ज
यंदा प्रवेशासाठी 1 लाख 15 हजार 298 जागा उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी 2 लाख 93 हजार 135 अर्ज दाखल झाले आहेत. मोबाइल ऍपद्वारे केवळ 13 अर्ज दाखल झाले आहेत. यात पुणे जिल्ह्यात 972 शाळांमध्ये 17 हजार 57 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यासाठी सर्वाधिक 63 हजार 132 अर्ज दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत कमी 51 शाळांमध्ये 347 जागांसाठी 377 अर्ज दाखल झाले आहेत.