शिरूरच्या 93 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत 27 मार्चला
गावपुढाऱ्यांची धाकधूक वाढली
विशाल वर्पे
केंदूर – शिरूर तालुक्याच्या मार्च 2020 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम दि. 27 रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वच गावच्या गावपुढाऱ्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
तालुक्यातील मार्च 2020 ते मार्च 2025 दरम्यान तब्बल 93 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये तब्बल 1 हजार 286 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडत काढण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामपंचायतीतील सरपंच पदे अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी जागा आरक्षित करण्यासाठी तहसीलदार यांना कळविले आहे.
शिरूर तालुक्यातील एकूण 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत होणार आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी चार तर पुरुषांसाठी चार जागा आरक्षित आहेत, अनुसूचित जमातीच्या दोन महिला व एक पुरुषासाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या तेरा महिला व बारा पुरुषांसाठी जागा आरक्षित ठेवल्या आहेत. सर्वसाधारणमध्ये तब्बल 29 महिला आणि 28 पुरुषांसाठी जागा आरक्षित आहेत.
93 ग्रामपंचायतीमधील 48 गावचा गावगाडा महिला हाकणार आहेत. तर 45 ग्रामपंचायतीचे कारभारी पुरुष असतील. त्यामुळे सरपंचपदाची संधी नक्की कोणाला मिळणार? गावात कोणाचे पारडे जड जाणार? महिलेसाठी आरक्षित जागा आली तर आपल्या पॅनलमधून कोण महिला उमेदवार असणार? पुरुषासाठी जागा आरक्षित झाली तर कोण रणशिंग फुंकणार? याची धाकधूक गावपुढाऱ्यांना लागून राहिली आहे. त्याचबरोबर आरक्षण निश्चित करतेवेळी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीच्या विचार करून सरपंच पद प्रवर्गनिहाय आलटून – पालटून नेमून देण्यात येणार आहे.
यापूर्वीचे आरक्षण पुन्हा येणार नसल्यामुळे अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत; मात्र कोणत्या गावचा सरपंच कोणत्या आरक्षित जागेचा असेल याची खात्री 27 मार्चलाच होणार असल्याने सगळ्यांनाच त्याची वाट पाहावी लागणार आहे.
तीन नव्या ग्रामपंचायतींचे स्वतंत्र आरक्षण
शिरूर तालुक्यात नव्याने तीन ग्रामपंचायत स्थापित झाल्या आहेत. त्यामध्ये मूळ टाकळी हाजी ग्रामपंचायत मधून विभाजन होऊन नव्याने माळवाडी आणि म्हसे बुद्रुक या दोन तर मूळ जांबूत ग्रामपंचायतमधून विभाजन होऊन शरदवाडी ही एक अशा एकूण तीन ग्रामपंचायत नव्याने स्थापन झाल्या आहेत मात्र या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत जिल्हास्तरावरील आढावा घेऊन त्यांचे स्वतंत्र आरक्षणाबाबत कळविण्यात येणार आहे.
या ग्रामपंचायती असणार लक्षवेधी
सणसवाडी, पाबळ, न्हावरे, तळेगाव ढमढेरे, केंदूर, जांबुेत, शिक्रापूर, करंदी, कारेगाव, कवठे यमाई, वडगाव रासाई, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप आणि टाकळी हाजी या तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सधन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.