राजकीय मुत्सद्देगिरीच्या चर्चेला उधाण; शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात सत्तेबाबत आतापर्यंत केलेल्या वक्तव्याने अन्य राजकीय पक्षांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. राज्यात सत्तास्थापनेचा कलह अजूनही सुरू असताना राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेनेपेक्षा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष विरोधातच बसणार, असे स्पष्ट केल्याने भाजपसह शिवसेनेचीही अडचण झाली आहे.
भाजपनेही आता आपली भूमिका जाहीर केल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे महत्त्व वाढल्याने लवकरच निर्णय होईल, अशा शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तूळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यामुळे बारामतीकरांच्याच हाती सत्तेची दोरी…, असे चित्र सध्याच्या राजकारणात निर्माण झाल्याने बारामतीकरांतही प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
केंद्रात आणि राज्यात कायमच सत्तेच्या जवळ राहीलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या भूमिकेतून धुरळा उडणार हे स्पष्ट झाले होते. राष्ट्रवादीला सत्तेच्या जवळ ठेवण्यासाठी पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा विरोधातच बसणार, असे जाहीर केल्याने राजकीय गुंता वाढत गेला आणि तो तसाच राहील याची काळजीही पवार यांनी घेतली.
भाजप आणि शिवसेना यांच्यात सरकार बनविण्याबाबत नाट्यमय घडामोडी सुरू असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्त्व कमी होणार नाही, याचीही काळजी पवार यांनी सुरवातीपासूनच घेतल्याचे स्पष्ट जाणवत आहे. भाजप आणि शिवसेनेची सत्ता पुन्हा येईल, असे वाटत असताना विधासभेची मुदत संपली (दि.10) तरीही युतीचं काही जमलं नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्व आता अधीकच वाढले असून ते कोणाला पाठिंबा देतात की स्वत:चेच सरकार बनवतात, याकडे लक्ष राहणार आहे.
मुंबई येथे माध्यमांशी बोलताना अल्पमतातील सरकार राज्याला नको आहे, स्थिर सरकार देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हंटले असतानाच मध्यवर्ती निवडणुकांना जनतेला समोरे जायला लागू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या भूमिकेमुळे खळबळ उडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काका-पुतण्यापासुन महाराष्ट्र मुक्त करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यासह भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही “पुन्हा-पुन्हा’ केले होते. मात्र, त्याच राष्ट्रवादीच्या पाठींब्याची गरज भाजपला वाटू लागली आहे. परंतु, पवार यांनीही भूमिका जाहीर करीत भाजप आणि शिवसेनेलाही झुलवत ठेवले आहे.
वेगवेगळे प्रतिक्रीया देवून राजकीय वातावरण तापवत ठेवले आहे. पवार यांच्या मनाचा थांगपत्ता लागणे कठीण आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. कोकण पट्ट्यातही पक्षाची पाळेमुळे घट्ट आहेत. उर्वरीत महाराष्ट्रातही राष्ट्रवादीच वरचढ ठरत आली आहे, असे असताना भाजपने फोडाफोडीचे राजकारण केल्याने राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आला, असे चित्र निर्माण करण्यात विरोधकांना यश आले होते. परंतु, यावेळची विधानसभा हातात घेवून पवार यांनी पक्षाचे आणि स्वत:चेही महत्त्व राजकारणात किती आहे. हे दाखवून दिले आहे.