मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला होता. राठोड याच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीची पहिली विकेट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात त्या रिक्त जागेसाठी राजकीय वर्तुळात कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी या रिक्त पदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा असं पत्र हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून त्यासाठी त्यांनी दोन पत्रंही लिहली आहेत.
या पत्रामध्ये संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा असे लिहिले असून अशी दोन पत्र त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. या पत्रातील मजकुरात पुढे लिहिले आहे की, बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
काय आहे पत्रातील मजकूर ?
महोदय,
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाचा सिटींग आमदार असतांना हरिभाऊ राठोड आणि प्रकाश अण्णा शेंडगे, युसुफ मनियार बालाजी शिंदे, डॉ.पी.बी. कुमार, अरुण खरमाटे, भाऊसाहेब बावणे यांनी ओबीसीची मोट बांधून शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता, आणि मित्र पक्षम्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही ओबीसी मंडळींनी संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करून अनेक प्रचाराच्या सभा स्वतंत्रपणे केल्या होत्या. व त्यामुळे मला जे कॉंग्रेस पक्षाकडून विधानपरिषद आमदार पद मिळणार होते ते पण मिळाले नाही, त्यामुळे माझ्या समाजाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. आज शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे, बंजारा समाजाच्या नेत्याची गरज आहे, योगायोगाने मी बंजारा समाजाचे नेतृत्व करतो, भटके विमुक्त, बारा बलुतेदार ओबीसी या समाजाचे पण मी नेतृत्व
करतो. माझे संपूर्ण महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात प्रचंड काम असून, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे,ठाणे,मुंबई या ठिकाणी सर्वत्र माझे काम आहे.
विधानसभा निवडणुकीत मी शिवसेनच्या १४ स्वतंत्र सभा घेतल्या ( त्या सभेचे फोटो सोबत जोडले आहे.) आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रक काढून य कार्यकर्ते पाठवून शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आवाहन केले, याची संपूर्ण माहिती मा.सुभाषजी देसाई यांना आहे. त्यामुळे शिवसेनाला महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात सुद्धा शिवसेना वाढीसाठी माझी मदत होऊ शकते असा मला विश्वास वाटतो, त्यामुळे संजय राठोड चे मंत्री पद मला देण्यात यावे, अशी नम्र विनंती आहे.